जाणीव…

अळूच्या पानावरील आकर्षक दवबिंदु,हसत डोलणारी सुंदर रंगीबेरंगी फ़ुले, त्या फ़ुलांच्या सुंदरतेला आव्हान देत त्यावर बागडणारी बहुरंगी फ़ुलपाखरे,आकाशातील आपल्याला हरवुन टाकणारी निळाई,हिरवागार निसर्ग,खोल दरया,उत्तुंग डोंगर-पर्वत,त्यामधुन टुथपेस्टची जाहिरात करत आहेत असे वाटणारे, खळखळ हसत वाहणारे छोटेमोठे झरे-धबधबे,आपल्या वेगळ्याच धुंदीत लयीत वाहणारया  नदया,नागमोड्या वाटा,अथांग पसरलेला समुद्र,त्या समुद्रातील अवखळ बेभान लाटा,आपल्या शितलतेने इतक्या दुरुनही पृथ्वीवर रोमँटिक वातावरण निर्माण करणारा चंद्र, त्याला साथ देत लुकलुकणारया चांदण्या,सुर्योदय-सुर्यास्ताचे मनमोहक देखावे, फ़ळे,पान, पक्षी,प्राणी,माझ्यासारख्यांना वेड लावणारा बहुढंगी,मनमौजी कधी रिमझिम बरसणारा कधी तुफ़ान कोसळणारा पाउस,त्या पाउसाने न्हाउन निघालेली तृप्त झालेली धरणीमाता,नुसत वाचुन आपल्याला वेगेवेगळ्या ठिकाणी नेणारी,वेगवेगळ्य विश्वात रमवणारी पुस्तके,गगनचुंबी इमारती,गाड्या,बसल्या जागेवरुन सातासमुद्रापलीकडील घटनांचे थेट प्रक्षेपण दाखवणारी,विविध पद्धतीने आपले मनोरंजन करणारी दुरचित्रवाणी, मोठ्या पडद्यावर चित्रपटांचा आस्वाद देणारी सिनेमागृह , मानवाचा सगळ्यात मोठा आविष्कार संगणक-त्याचे विविध चमत्कार, आरशातील स्वत:चे प्रतिबिंब,लहान मुलाच्या चेहरयावरील अल्लड, निरागस भाव…किती सुंदर आहे ना हे जग..!

हयातील एखादी गोष्ट तुम्हाला दिसली नाही तर…म्हणजे तुमचा एखादा मित्र म्हटला हे फ़ुल किंवा तो डोंगर बघ किती सुंदर आहे पण तुम्हाला ते फ़ुल किंवा तो डोंगर दिसतच नाहीये,तुम्ही किती अस्वस्थ व्हाल…आणि जर तुम्हाला हयातले काहीच दिसले नाही तर…आंधळी कोशिंबीरचा खेळ आपण लहानपणी खेळतो तेव्हा डोळ्यावर पट्टी बांधल्यावर थोड्या वेळात ही पट्टी काढली जाईल ही जाणीव असतांनाही आपली होणारी अवस्था आठवुन पहा…मग ब्रम्हदेवाने ज्यांच्या डॊळ्यावर  अशी कधीही न निघणारी कायमस्वरुपी पट्टी बांधुनच त्यांना हया जगात पाठवलेले आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का ?

 

किती सुंदर आहे हे जग..आणि मी ते पाहु शकतो...

 

मला माझ्या ब्लॉगपोस्टमधील सर्वाधिक आवडणारया पोस्ट म्हणजे ’फ़ॉर माय आइज़ ऑन्ली’ त्यात मी लिहल होतच माझा सर्वात जास्त काम करणारा,सर्वात आवडणारा अवयव आहे तो म्हणजे हा डोळाच.त्यात हया डोळ्यांबद्दल एक गोष्ट लिहायची राहुन गेली होती ती म्हणजे मी खुपच स्वप्नाळु असल्यामुळे झोपेतही डोळ्यांना आराम देत नाही.पण ज्यांनी हे जगच अजुन पाहिले नाही ती लोक स्वप्नात काय पाहत असतील हा प्रश्न मनात आला..उत्तर एकच होत फ़क्त काळाकुट्ट अंधार ! रंग,दिशा,पहाट,सकाळ,दुपार,संध्याकाळची कातरवेळ अस काही नाही त्यांच्या नशिबी फ़क्त जीवघेणा काळोख!आपल्या लिखाणातुन आपल्याला भुत,वर्तमान आणि भविष्यकाळाच्या कल्पनाविश्वात रमवणारया लेखक-कविंनाही डॊळ्यांनी पाहिलेल्या कोणत्यातरी गोष्टीचा संदर्भ लागतोच ना…हयांच्या कल्पनेतही फ़क्त अंधारच…परवा ब्लॉगमित्र संकेत ने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मला सांगीतल वाढदिवस स्मरणीय कर म्ह्णुन.. काल नेत्रदानाचा फ़ॉर्म भरुन मी माझ्यासाठी तरी तो  संस्मरणीय केला आहे.त्याच दिवशी वाढदिवस असलेल्या माझ्या संदीप जिभे नावाच्या एका मित्राला मी हयाबद्दल सांगीतले.त्यानेही नेत्रदानाचा फ़ॉर्म भरुन त्याचाही वाढदिवस संस्मरणीय केला.

मी मागे रक्तदानावर केल्याने रक्तदान ही एक  पोस्ट ब्लॉगवर टाकली होती त्यावर ठाण्याच्या श्रीपद आगाशे हयांनी प्रतिक्रिया दिली होती त्यात  नेत्रदानाबद्दल थोडी माहिती दिली होती.तेव्हा मी ’विचार करु’ अस करत विसरुन गेलो होतो.त्यानंतर माझ्या तांदुळवाडी ट्रेकच्या पोस्टवर आगाशे हयांची  प्रतिक्रिया आली,” आपला लेख आवडला, छायाचित्रे तर सुंदरच आहेत.मी सुमारे १२ वर्षांपूर्वी तांदूळवाडीला गेलो होतो, तेव्हाच्या पावसात मी सुद्धा छायाचित्रे काढली होती.छायाचित्रांचा, निसर्गरम्य स्थळांचा आनंद आपण आपल्याला अमूल्य अशी दृष्टी असल्यामुळेच घेऊ शकतो पण ज्यांना ती नाही त्यांचे काय? ” हा प्रश्न मला खुपच अंतर्मुख करुन गेला आणि तेव्हाच मी हा वाढदिवसाचा मुहुर्त मनात पक्का केला होता. श्री. आगाशे  नेत्रदानाबद्दल जनजागृतीचे काम गेली तीन दशके अविरत पार पाडत आहेत.आज साठीतही त्यांचा हयाबाबतचा उत्साह थोडाही कमी झालेला नाही.आजच्या जलद जीवनात स्वत:साठी वेळ काढणेही जमत नसतांना  तब्बल तीन दशके अश्या प्रकारच्या समाजकार्याला वेळ देणारया आगाशे हयांना खरच सलाम.कुठे ते मतांसाठी नको त्या मुद्द्यांवर राजकारण करत बसणारे तथाकथित समाजसेवक  आणि कुठे हे असे कसलीही अपेक्षा न करता निस्वार्थ वृत्तीने खरया अर्थाने अखंड समाजसेवा करणारे…

नेत्रदानासंबधी मार्गदर्शनासाठी व अधिक माहिती साठी श्री. आगाशे हयांना shreepad.agashe@gmail.com किंवा www.netradaan.blogspot.com इथे संपर्क साधावा.

१४ ते २१ ऑक्टोबर २०१० , दुपारी १ ते रात्री ९ या वेळेत श्री. आगाशे ठाण्यातील ग्राहक पेठेत शुभंकरोती हॉल, राम मारुती  मार्गावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या मागे   नेत्रदानासंबधी  स्टॉल टाकीत आहेत.इच्छुकांनी तिथे जरुर भेट द्यावी.

श्रीलंकेसारख्या अगदी छोट्या देशात  मरणोत्तर राष्ट्रीय संपत्ती म्हणून बहुसंख्य लोक नेत्रदान करतात. तेथे जरूरीपेक्षा दहापट जास्त नेत्रदान केले जाते.दरवर्षी श्रीलंकेतुन सुमारे १० हजार डोळे आपल्याला दिले जात आहेत.श्रीलंकेसारखा छोटासा देश जगातील ३६ देशांना डोळे पुरवतो आणि त्यांच्या कितातरी पट अधिक लोकसंख्या असलेलो आपण त्यांच्याकडुन डोळे दान घेतो.हे चित्र खरच चांगल नाही.आपल्याकडे नेत्रदानाबाबत अजुनही योग्य जनजागृती झालेली नाहीये.नेत्रदानामुळे चेहरा विद्रुप होतो, पुढील जन्मी अंधत्व येते असे अनेक गैरसमज समाजात पसरले आहे.हे गैरसमज दुर व्हायला हवेत.

नेत्रदानाला वय, जात, लिंग, धर्म यांची अट नाही.नेत्रदानासाठी पैशाची श्रीमंती लागत नाही. आपल्या आप्तांसाठी वेगळ्या प्रकारे आपल्या स्मृती जपण्याची ही एक संधी आहे.ज्या समाजात राहतो त्याच ऋण काही प्रमाणात कमी करण्याची संधी आहे.मृत्यूनंतर ६ तासांच्या आत नेत्रदान करावे लागते.नेत्रदान मरणोत्तर करावे लागत असल्याने त्याचा आपल्याला काही त्रास होत नाही.ज्यांना एडस,रेबीज हयांसारखे  रोग झालेले आहेत त्यांचे डोळे नेत्ररोपणासाठी अपात्र ठरतात मात्र त्याचा उपयोग संशोधनासाठी केला जातो.मेंदूज्वर,कर्करोग असला तरी जर का पारपटल ( Cornea ) चांगले असेल तर नेत्रदान होऊ शकते.नेत्रदान मोफत होते.नेत्ररोपण सरकारी,महापालिका तसेच काही ट्रस्टच्या रुग्णालयांतून मोफत केले जाते.आपल्यामुळे दोन अंधारलेली आयुष्य प्रकाशाने उजळुन निघणार आहेत, ही भावना खरच खुप सुखावह आहे.तेव्हा गरज आहे  जाणीवेची,एका इच्छाशक्तीची…

मी मेल्यावरही माझे हे आवडते डोळे जिंवत राहणार आहेत, परमेश्वराने बनवलेल्या हया सुंदर सृष्टीकडॆ पाहत ते परमेश्वरालाच चिडवणार आहेत, ’ हया व्यक्तीला हे सुंदर जग न दाखवण्याचा तुझा प्रयत्न फ़सला आहे ,तु हरला आहेस देवा…’


संदीप खरे आणि सलील कुलकर्णी हयांच्या मला अतिशय आवडणारया ’देते कोण’ गाण्यातुन मला तुम्हाला काही विचारायचे आहे….

चिमुकल्या चोचीमधे आभाळाचे गाणे
मातीतल्या कणसाला मोतीयांचे दाणे
उगवत्या उन्हाला या सोनसळी अंग
पश्चिमेच्या कागदाला केशरी हा रंग

देते कोण, देते कोण, देते कोण देते …….