एक था टायगर …

पाडव्याच्या दिवशी जेव्हा त्या अफवा ऐकल्या तेव्हा वाटलं लवकरच मातोश्रीतून रुद्राक्षांची माळ परिधान केलेला हात उंचावेल आणि ……पण …. 😦 😦 😦


राजकारण आवडत नसल तरी मला इतका भावलेला,मला इतक आकर्षित करणारा आजच्या घडीचा एकमेव राजकीय नेता म्हणजे आपले साहेब…. साहेबांच एकूण व्यक्तिमत्वच अस आहे कि ‘लव इट ऑर हेट इट बट यु कांट इग्नोर इट’, म्हणूनच त्याना निस्सीम प्रेम-श्रद्धा अनुभवायला मिळाली आणि बरोबरच प्रखर विरोधही सहन करावा लागला.”हम खुशनसीब है हमे दुश्मन भी मिला तो सिवा जैसा” अस औरंगजेबाने म्हटलेलं तसच त्यांचा राजकीय शत्रुनांही आता नक्कीच वाटलं असेल.तर अश्या प्रकारे साहेब एकतर कोणाच्या हृदयात असायचे नाहीतर मग डोक्यात तरी, आणि मी शिवसैनिकही नसतानाही लहानपणापासूनच त्यांच्या ‘डॅशिंग’ पणामुळे त्यांना माझ्या हृदयात जागा दिली होती.आणि अश्या प्रकारे माझ्यासारख्या अश्याच लाखो लोकांच्या हृदयात विराजमान होऊन ते ‘हिंदुहृदयसम्राट’ झाले होते, आजही आहेत आणि निरंतर राहतील.

गेल्या दोन-तीन दिवसात बाळासाहेबांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल वर्तमानपत्रात खूप काही लिहून आलेल आहेच आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल कितीही लिहल तरी कमीच असल तरी मला त्याबद्दल इथे काही लिहायची काही गरज नाहीये.पण ही पोस्ट टाकावीशी वाटली ती सोशल मीडियावर वाघ गेल्यानंतर चालू असलेल्या माकडचाळयांमुळे…साहेबांबद्दल काडीचीही माहिती नसलेली शेबंडी पोर साहेबांबद्दल काहीही बरळताहेत.मी बाळासाहेबांबद्दल वाचलेल्या काही इंग्लिश लेखांवरील प्रतिक्रिया तर वाचवत नाहीत इतक्या ओंगळ आहेत.(इथे जाणीवपूर्वक त्या लिंक्स देत नाहीये) ठीक आहे एखाद्याची मत मान्य नाही पण काळ-वेळच काही भान नको.इतर वेळी कोणी अस काहीस बरळल तर कदाचित इतक लक्ष कोणी दिल नसत.व्यक्तीस्वातंत्र्य असल तरी आपण कधी आणि काय बोलतोय त्याचा आता काय परिणाम होईल ह्याचा थोडाही विचार करायला नको का…

तर नको तिथे आपली अक्कल पाजाळणाऱ्यांनी जरा इथे लक्ष द्या,
हा इतका जनसमुदाय आणि सर्वच क्षेत्रातले दिग्गज फक्त भीतीने तिथे आले होते का .. आणि तेसुद्धा ते गेल्यावर …एखाद विधान करून क्षणात ‘मी हे वाक्य कधी बोललोच नाही’ अस म्हणणाऱ्या नेत्यांच्या गोतावळ्यात साहेबांसारखा धनुष्यातून निघालेल्या बाणासारखा ठाम,परखड आणि सडेतोड बोलणारा आणि बोलून नंतर पलटणारा एक तरी नेता आहे काय …आणि साहेब भाषणही कधी लिहून आणायचे नाही जे बोलायचे ते अगदी उत्स्फूर्त…तब्बल साडे चार दशक शिवाजी पार्कात ते आपल्या अमोघ वक्तृत्वाने अवघ्या जनमानसाची मने जिंकत राहिले,इतक्या प्रदीर्घ काळ अशी परंपरा राखणारा दुसरा कोणी नेता आहे का …सत्ता हातात आलेली असतानाही तिचा लोभ न धरता ती कार्यकर्त्यात वाटणारा नेता आहे का दुसरा कोणी …९३ च्या दंगलीत मुंबईकरांना सावरणारे हात होते ते साहेबांचेच…गुंड प्रवृत्तींवरही साहेबांचा वचक असल्यामुळेच मराठी आणि हिंदू नाही इतर धर्मीय लोकही निर्धास्तपणे घराबाहेर पडत आहेत …आजकाल नेता मेल्या वर लोकांना आनंदच जास्त होतो पण बाळासाहेब ह्याला अपवाद ठरले ते नुसतेच का …..जीवाला जीव देणारी माणसे घडवण्याची कला शिवाजी महाराज आणि पहिल्या बाजीरावानंतर कोणाला जमली तर ती साहेबांना …आज ते गेल्यावर लाखो लोकांच्या घरात घरातलं कोणी गेल्याची जी भावना निर्माण झाली आहे ती उगाच आहे का …खर आहे इतर वेळी आपली जीवनगाडी हाकण्यात मग्न असलेल्या आमच्यासारख्यांच्या ध्यानीमनी नव्हते साहेब पण ती बातमी एकताच लाखो लोकांच्या मनात एक पोकळी का निर्माण झाली, एक हलकीशी का होईना असुरक्षिततेची कल्पना त्यांच्या मनात का आली…ते नुसते असण्याचाही मोठा आधार होता …

तर लक्षात घ्या त्यांच नाव ‘बाळ’ असल तरी अवघ्या महाराष्ट्राचे ते ‘बाप’ होते …

हिंदुहृदयसम्राट,शिवसेनाप्रमुख,तडफदार नेता,एक थोर व्यंगचित्रकार,निर्भय आणि खंदा व्यक्ता,एक भगव वादळ,एक झंझावात,एकटा टायगर -ढाण्या वाघ,मराठी अस्मितेचा बुलंद आवाज,ज्वलंत हिंदुत्वाचा एकमेव खुला पुरस्कर्ता

अश्या मा. बाळासाहेब ठाकरेंना ह्या दवबिंदूकडून मानाचा मुजरा आणि भावपुर्ण श्रध्दांजली…

झालेत बहु
होतील बहु
परंतु या सम हाच…

एक पर्व संपले….एक वादळ शांत झाले …

पण त्यांनी आपल्यात निर्माण केलेला स्वाभिमान जपून आपण त्यांना निरंतर जिवंत ठेऊया …जय महाराष्ट्र !!!

दिवाना ‘तुझसा’ नही ….

मी माझ्या आधीच्या एका पोस्टमध्ये लिहल होत, ‘भारतातील बहुसंख्य लोकांच्या रक्तात पाण्याबरोबरच अजून दोन महत्वाचे घटक मिसळलेले आहेत….ते म्हणजे क्रिकेट आणि सिनेमा’ … आणि माझ्या ह्या विधानाला मी सुद्धा अपवाद नाहीये. लहानपणापासून मी  क्रिकेटबरोबरच सिनेमासृष्टीवर अगदी मनापासून प्रेम केल.हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात मी दिलेल योगदान तुम्ही ‘सा रे ग म प‘ इथे वाचल असेलच.  🙂  तर माझ्या हिंदी सिनेमासृष्टीतील कारकिर्दीच्या  (प्रेक्षक म्हणून हो … 🙂 ) सुरुवातीच्या काळात  मी ज्यांचा मोठा पंखा होतो त्या ‘याहू मॅन’च चार दिवसांपूर्वीच वयाच्या ७९ व्या वर्षी  निधन झाल.त्यामुळे नेहमीच म्हटलं जात तस ‘चित्रपटसृष्टीच किती अपरिमीत नुकसान’ झाल ते माहित नाही पण माझ्यासाठी तरी तो मला माझ्या बालपणाशी जोडणारा एक ‘हिरो’ होता.  पृथ्वीवरील तो ‘गंधर्व’  इथल नश्वर शरीर सोडून आता देवाघरी गेला आहे . कदाचित स्वर्गातील चैतन्य कमी झाले असल्याने देवाने त्याला आपल्या जवळ  बोलावून घेतल असाव.तर माझ्या रक्तात सिनेमा हा घटक मिसळण्यासाठी सर्वात पहिल इंजेक्शन मी घेतलं  होत ते ह्या शम्मीसाहेबांच्याच नावाच. त्यांची गाणी,जुने चित्रपट बघतांना नेहमीच  मला लहानपणीच्या अनेक गोष्टी आठवतात.म्हणूनच अश्या मला माझ्या बालपणाशी जोडणार्यां एका ‘हिरोची’  आठवण म्हणून हा छोटासा लेखप्रपंच.

त्यांचा नातू रणबीर कपूर याच्या ‘रॉकस्टार‘ या आगामी चित्रपटात ते आपल्याला शेवटचे दर्शन देणार आहेत.

खरतर ‘त्या’दिवशीच ही पोस्ट लिहायला घेतली होती पण पूर्ण करू शकलो नाही .मग  वर्तमानपत्रात अनेक लेख वाचायला मिळतीलच असे वाटून तो ड्राफ्ट तसाच सोडून दिला.पण सध्या घडत असलेल्या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे प्रसारमाध्यमांनी ह्या घटनेची हवी तशी दखल घेतली नाही.मटाने तर त्यांच्या खास प्रतिनिधीच्या बातमीत खुद्द शम्मी साहेबांनाच स्वत:चा शेवटचा  निरोप घ्यायला बाणगंगेपाशी पोहोचवले. असो तर काल  सुट्टी होती आणि त्यात सकाळीच अचानक ह्या बॉलीवूडच्या प्रिन्सची आठवण आली.मग काय तुनळीवर ‘याहू मॅन’ची  एका मागे एक अशी गाणी पाहत गेलो आणि त्यातच गुंग होऊन  एकदम नोस्टॅल्जिक होऊन गेलो आणि काहीतरी हरवल्याची जाणीव झाली  मग  नेहमीच्या  कंटाळ्याला  दूर भिरकावून ही पोस्ट पूर्ण करायला घेण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही .खरच काल इतका शम्मीमय होऊन गेलो होतो कि  जितक्या लोकांशी चॅटवर बोललो त्या सर्वांबरोबर शम्मीचा विषय काढल्याशिवाय राहिलो नाही .

शम्मी कपूर  म्हणजे चैतन्याच,उत्साहाच दुसर नाव…त्यांच खर नाव शमशेरराज कपूर होय.त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ ला मुंबईत कपूर घराण्यात झाला.आपल मेट्रिकपर्यंतच शिक्षण संपवून रुईया कॉलेजमध्ये थोडेसे दिवस भरल्यावर त्यांनी १९४८ ला वडिलांच्या  ‘पृथ्वी थियेटर्स’ मध्ये ५० रुपये मासिक पगारावर ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली.त्यांनी काम केलेल्या पहिल्या नाटकात खुद्द पृथ्वीराज कपूर ह्यांनी देखील काम केल होत.पाच वर्ष ‘पृथ्वी थियेटर्स’ मध्ये काम केल्यावर त्यांच्या ‘पठान’ नावाच नाटक बघून  महेश कौल ह्यांनी   १९५३ मध्ये ‘ जीवन ज्योती ’ या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर अभिनेता म्हणून पदार्पण करायची संधी दिली.पण तो चित्रपट काही चालला नाही. त्यानंतर तब्बल पाच वर्ष यश त्यांना हुलकावणीच देत राहिले.त्यांच्या एकामागोमाग एक चित्रपटांवर फ्लॉपचा शिक्का बसत गेला.ह्याच दरम्यान त्यांनी ‘मेमसाहिब’ ह्या किशोर कुमार आणि मीनाकुमारीबरोबरच्या सिनेमात खलनायकाचेही काम केले.१९५५ मध्ये त्यांनी  गीता बाली ह्या त्यांच्या एका सहअभिनेत्रीसह घरचा विरोध असल्याने बाहेर मंदिरात जाऊन नाटकीय पद्धतीने  लग्न केल.त्यांच्याकडूनच त्यांना पुढे आदित्यराज आणि कांचन ही दोन अपत्ये झाली. गीता बाली ह्यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि दिलेल्या हिमंतीमुळेच आपण पुढे आलो नाहीतर सततच्या अपयशामुळे सिनेमाजगताचा  कायमचा निरोप घ्यायचं आपण ठरवलं होत, अस त्यांनी मागे एका मुलाखतीत सांगीतल होत. पुढे १९५७ साली नासिर हुसैनने काढलेल्या  ‘तुमसा नही देखा’  चित्रपटाने शम्मीला यशाची चव चाखवत सिनेमासृष्टीत एक  वेगळी ओळख निर्माण करून दिली.त्यानंतर मात्र ह्या बॉलीवूडच्या राजकुमाराने कधी मागे वळून पाहिले नाही.

१९६१ मध्ये त्यांचा ‘या~~~हू ‘ वाला  पहिला रंगीत सिनेमा ‘जंगली’ प्रदर्शित झाला आणि ते रातोरात सुपरस्टार झाले.खरतर त्यावेळी बॉलीवूडमध्ये राज-दिलीप-देव ह्या त्रिकुटाच साम्राज्य होत.(देवसाहेबही आपल्याला लहानपणी खूप आवडायचे ,बर का   🙂  ) ह्या दिग्गज तिघांना मजबूत टक्कर देत शम्मी कपूरने राजकुमार बनून आपल्या हटके स्टाईलने स्वत:च  वेगळ राज्य निर्माण केल आणि ते टिकवलेही … जंगली नंतर शम्मीनी प्रोफेसर,ब्लफमास्टर, चायना टाऊन,राजकुमार ,जानवर ,काश्मीर कि कली असे अनेक उत्तमोत्तम सिनेमे केले.पुढे  नासीर हुसैनच्या तिसरी मंझील ह्या चित्रपटातून देव आनंद बाहेर गेल्यावर जेव्हा शम्मींना हा चित्रपट ऑफर केला गेला.तेव्हा शम्मीनी त्याला सांगितलं जर देव आनंद स्वत: मला सांगेल कि ‘त्याने हा चित्रपट स्वत:च्या इच्छेने सोडला असून तो मी करण्यात त्याला काही आक्षेप नाही ‘ तरच मी हा चित्रपट करेन . मग देव आनंदशी बोलण झाल्यावरच त्यांनी हा सिनेमा स्वीकारला.

तिसरी मंजिलच शुटींग चालू असतांनाच १९६५ साली  त्यांच्या पत्नी गीता बाली यांचा देवी ह्या रोगाने  मृत्यू झाला.त्या देवीने दगावलेल्या भारतातल्या शेवटच्या अधिकृत रुग्ण आहेत.त्यांच्या मृत्युचा शम्मींनी खुपच धसका घेतला ते आतून खूप ढासळले.तश्या उध्वस्त मनस्थितीतच त्यांनी तिसरी मंजीलच शुटींग पूर्ण केल.त्यांच्या अतिशय प्रिय गीता बाली ह्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर सर्वात पहिलं चित्रित  केलेल गाण ‘तुमने मुझे देखा ‘ वर जोडलं आहे.ह्या माहितीसह एकदा जरूर बघा तो विडियो…त्याच्या डोळ्यात बघा…पुढे ह्या ‘तिसरी मंजील’ चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवले आणि त्या यशानेच शम्मींना त्या मोठ्या धक्क्यातून सावरले.पुढे त्यांनी लाट साहब,पगला काही का, इव्हनिंग  इन पैरिस,ब्रम्हचारी ,तुमसे अच्छा कौन है ,प्रिन्स असे अनेक चित्रपट केले..ब्रम्हचारी या चित्रपटासाठी तर  त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ठ नायकाचा पुरस्कारही  मिळाला.१९६९ मध्ये ते भावनगरमधील राजघराण्यातील निलादेवी ह्यांच्याशी विवाह केला.१९७१ मध्ये त्यांनी राजेश खन्ना बरोबर केलेला ‘अंदाज’ हा त्यांचा अभिनेता म्हणून हिट झालेला शेवटचा चित्रपट.योगायोगाने हा शंकर-जयकिशनचा पण एकत्र काम केलेला शेवटचा सिनेमा.ह्यातील ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ हे गाण आपल्याला किशोर आणि रफी ह्या दोघांच्याही आवाजात ऐकण्याची अनमोल संधी मिळते. त्यानंतर ते आपल्या स्थूल शरीरामुळे चरित्र अभिनेते म्हणून काम करू लागले.दरम्यान त्यांनी दिग्दर्शक म्हणून  मनोरंजन व बंडलबाज हे दोन चित्रपट काढले पण ते तितकेसे चालले नाहीत.पण म्हणून ते बॉलीवूडपासून दूर झाले नाहीत.अगदी आताचेही  अनेक नवीन चित्रपट ते पाहत.कोणाचा अभिनय आवडल्यास स्वत: संपर्क करून त्याची प्रशंसा करत.

आमीर खान शम्मी साहेबांचा मोठा पंखा असून त्यांना तो खूप मानायचा  आपल्या  प्रत्येक सिनेमाच्या आधी शम्मी साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे  जायला  तो कधी चुकत नव्हता.

आयुष्याच्या पुढील प्रवासात त्यांना सिनेमाने जितक झपाटल होत तितकाच दुसऱ्या एका गोष्टीने झपाटल ते म्हणजे संगणक…त्याचं संगणकावरील प्रेम हे अगदी  ‘लव अॅट फर्स्ट साईट’ होत.त्यांनी संगणकावर अगदी मनापासून प्रेम केल.१९८८ ला  त्यांनी घेतलेल्या ८ एमबी रॅम मेमरी  असलेल्या संगणकाबद्दल ते कसे भरभरून बोलतात ते खालील विडीयोत पहा. त्यांनी संगणकाचा बराच अभ्यास करून त्याबाबत तांत्रिक ज्ञानही आत्मसात केल होत .संगणकाबद्दल भारतात इंटरनेटचा वापर  करणाऱ्या पहिल्या-वाहिल्या व्यक्तींमध्ये शम्मी कपूरच नाव घेतलं जात.१५ ऑगस्ट १९९५ मध्ये भारतात VSNL ने    GIAS (Gateway Internet Access Service ) च्या माध्यमातून इंटरनेट आणल.पण शम्मी साहेबांकडे ह्याच्या खूप आधीच  बिटिश टेलिकॉम कडून VSNL च्या मार्फत मिळवलेल इंटरनेट कनेक्शन होत. ते इंटरनेट युजर्स कमुनिटी ऑफ इंडिया (आययूसीआय) या संस्थेचे संस्थापक-चालक होते.कपूर घराण्याची वेबसाईट शम्मीसाहेबच सांभाळत. ह्या संगणकाचा ‘माऊस’ हातात आला आणि माझी सिगारेट सुटली,ह्याची कबुली त्यांनी मागे दिली होती.’याहू’ ने भारतात पदार्पण करतांनाच्या कार्यक्रमात  शम्मी साहेबाना बोलावलं होत. त्यासंबधातील ही  बातमी वाचा. ते फेसबुक ,ट्विटर च्या माध्यमातून वयाच्या  ७९ व्या वर्षीही तरुण पिढीशी आपल नात जोडून चिरतरुण राहिले  होते.

त्याकाळच्या देव-दिलीप-राज च्या युगात त्यांना टिकता आल ते त्यांच्या खास अदाकारीमुळेच…… रफींचा आवाज आणि त्यांचा अंदाज ह्यांच्या संगमातून कितीतरी अजरामर गाणी त्यांनी बॉलीवूडला दिली. त्यांची आगळीवेगळी नृत्यशैली ,मान वाकडी करत चेहऱ्यावर भन्नाट भाव दाखवण, अतिशय बोलके असलेले  डोळे मध्येच अलगद बंद करण लोकांना वेड करत होत.तो चित्रपटात बेधुंद होऊन नाचत असे आणि तो नाच पाहतांना प्रेक्षकही तितकेच बेधुंद होऊन जात. बॉलीवूडमधील सोज्वळ,सालस अभिनेत्याच्या प्रतिमेला त्यांनीच सर्वप्रथम तडा दिला.आपल्या रांगड्या अभिनयाने,खास अश्या स्टाईलने बॉलीवूडमधील  हिरोला त्यांनी  एक वेगळेच मस्तीखोर,जंगली  अस रूप दिल.त्यानी पडद्यावर जे काही केल ते  त्यालाच शोभून दिसणार त्या ठिकाणी दुसर्या कोणाचा विचारही  करण कठीण आहे. मधुबाला,नूतन,आशा पारेख, साधना,शर्मिला टगोर अश्या त्यावेळच्या सगळ्याच टॉपच्या नायिकांसोबत त्यांनी काम केल.ते बॉलीवूडचे   Elvis Presley म्हणूनही ओळखले जात.बॉलीवूडमधील सर्वात रोमॅन्टिक हिरो कोण आहे ह्याला माझे उत्तर परवापर्यंत कदाचित वेगळ असत पण आता आणि ह्यापुढे सदैव ह्या प्रश्नाच एकच उत्तर असेल माझ्याकडे शम्मी आणि फक्त शम्मी…

खरतर दोन वर्षापुर्वी ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती तेव्हा शम्मींवर काही लिहाव अस मनात आल होत पण ते भाग्य नाही लाभल मला…. तस बघायला गेल तर गेल्या कित्येक महिन्यात त्यांची छोटीशी  आठवणही कधी आली नव्हती.पण शाळेत असतांना  वर्षाच्या सुरुवातीला आपण एखादा धडा मन लावून वाचतो ,समजावून घेतो आणि पुढे वर्षभर त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही अगदी विसरून जातो  ते सगळ .मग वर्षाच्या शेवटी कधीतरी वाटते अरे हे वाचायला पाहिजे आता ,मग तुम्ही जशी त्यावर पहिली  नजर फिरवता तुमच्या लक्षात येत ,हे सगळ तर आपल्याला माहित आहे.तसाच काहीस काल शम्मींचे विडियो पाहतांना झाल.अनेक आठवणीना उजाळा मिळाला.परत एकदा शम्मीच्या प्रेमात पडलो मी…आमच्या काकाश्रीनी आणलेल्या ‘ बेस्ट ऑफ शम्मी कपूर’ ह्या कॅसेटमुळे,रविवारी सकाळी लागणार्या रंगोलीतील त्याच्या गाण्यांमुळे   व  डीडी-२ वर त्याकाळी दुपारी दाखवल्या जाणाऱ्या सिनेमांमध्ये त्याचे अनेक चित्रपट पाहिल्यामुळे  त्यावेळी  तो माझा ‘हिरो’ झाला होता.त्याचा पडद्यावरील वावर खरच प्रसन्न करून जायचा.काल शम्मीमय असतांनाच संध्याकाळी मित्रांबरोबर असतांना अण्णांबद्दल महाचर्चा झाल्यावर मी  शम्मीचा विषय काढला तेव्हा त्याची अनेक गाणी माहिती असली तरी आमच्या पाचजणांमधील  मी सोडून  इतर कोणीही त्याचा एकही सिनेमा पाहिलेला  नव्हता .त्यांना त्याच काही वाटत नव्हत पण मला मात्र स्वत:चा खूप अभिमान वाटत होता.

तशी त्याची जवळ जवळ सगळीच गाणी आवडतात.त्यातली काही निवडक गाणी खालीलप्रमाणे आहेत ..

  •  एहसान तेरा होगा मुझ पर
  •  दीवाना मुझ सा नहीं
  •  चाहे कोई मुझे जंगली कहे
  •  तुमने मुझे देखा
  •  दिवाना हुआ बादल
  •  तुम मुझे यूँ भूला न पाओगे
  •   तुमसा नहीं देखा
  •   ऐ गुलबदन
  •   दिल देके देखो
  •   ओ हसिना जुल्फो वाली
  •   आजा आजा मै हू प्यार तेरा
  •   आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे
  •   गोविंदा आला रे
  •   आसमानसे आय फरिश्ता
  •   चांदसा रोशन चेहरा

आता तीन दिवसातच गोपाळकाला आहे, बॉलीवूडमध्ये गोपाळकाल्यावर अनेक गाणी चित्रित केली गेली आणि त्यातली बहुतांशी सर्वच गाजली पण ज्या पद्धतीने, ज्या एनर्जीने शम्मींनी  ‘गोविदा आला रे आला’ सादर केल त्याला खरच तोड नाही ….

बॉलीवूडमध्ये अनेक चांगले अभिनेते होते/आहेत ,निर्विवाद शम्मीपेक्षाही चांगलेही होते/ आहेत, पुढेही होतील पण…असा ‘जिंदादिल’, ‘हटके’ दुसरा ‘शम्मी’ होणे नाही …

(छायाचित्र गुगलवरून साभार )