घराच घरपण …

‘ही काय कटकट आहे, ‘ अस मनातल्या मनात चरफडतच  मी मोबाईलमधून वाजणारा अलार्म कोणततरी बटण  दाबून बंद केला.एव्हाना डोळ्यावर सूर्याची कोवळी किरणही ‘ठकठक ‘ करायला लागली होती.मी डोळ्याचा पडदा थोडासा ‘मायक्रोमीटर’ उघडून इथे तिथे पाहिल.मी आमच्या गावातल्या घरात होतो आणि ते जाणवल्यावर मी जरा जास्तच ‘रिलॅक्स’ झालो. वर तो थोडासा जुना झालेला पंखा एक विशिष्ट आवाज काढत आपल्याच लयीत फिरत होता.भिंतीवर सूर्यकिरणांनी मस्त नक्षीदार रांगोळी काढली होती.देवघरातील अगरबत्ती,बाहेर पेटत असलेल्या चुलीतील धूर ,त्यावर तयार होत असलेली भाकरी ,कोणततरी फुललेल फुल आणि दुसरेपण कसलेतरी पण  छानच वाटणारे वेगवेगळे  वास ‘हर हर महादेव’ करत वेगवेगळी आवर्तन घेत  माझ्या  नाकाच्या गुहेत शिरकाव करत होते. कसल्याश्या पक्षांचा हलकासा किलबिलाट चालू होता.जणू ते माझ्यासाठी ‘उठी उठी गोपाळा ‘ चे रागच आळवत होते.सगळ कस मस्तच वाटत होत,पण तितक्यात मोबाईल परत बोंबलायला लागला.ह्यावेळी मी डोळे थोडेसे जास्त ‘मायक्रोमीटरने’ उघडले.वर नजर गेली तर तो आमच्या कॉलनीतल्या घरातला मॅड पंखाच स्वत:भोवती गिरक्या घेत घेत माझ्याकडे बघून हसत होता.मी लागलीच मोबाईल हातात घेतला तेव्हा लक्षात आल केव्हापासून  ‘स्नुझ’  करत करत आता ऑफिसची  बस यायला केवळ १५ मिनटे राहिली होती.क्षणार्धात अवघ जगच पालटलं होत. मी मनाच्या इच्छेविरूद्ध त्याच्याशी जोरदार लढा देत कसाबसा अंथरुणावरून उठलो आणि झटपट पुढच्या तयारीला लागलो. 🙂

मित्रांनो तुमच्याबरोबर अस कधी झाल आहे का कि कोणत्यातरी क्षणी तुम्हाला राहत्या घरात असतांना गावातल्या घरात वैगेरे असल्याच जाणवत.बघा आठवून कारण  माझ्याबरोबर अस एकदा नाही तर चांगल तीन-चार वेळा झालेलं आहे .नाही माझा ऋषी कपूरच्या ‘कर्ज ‘ सिनेमासारखा काही ‘सीन’ नाहीये,कारण हे घर माझ्यासमोरच बांधल गेल आहे त्यामुळे पूर्वजन्मात वैगेरे तिथे राहिल्याचा प्रश्न येत नाही.तस आम्ही लहान असतांना हे घर बांधल गेल आहे.लहानपणी मे महिन्याची सुट्टी पडली रे पडली कि आम्ही ‘डायरेक्ट’ गावी न जाता आधी  मुंबईला (जोगेश्वरी) राहणार्या आत्याकडे जायचो  आणि तिथे चांगली आठ-दहा दिवस धमाल करून मग आत्याच्या मुलांसह गावी परतायचो.पण ज्या वर्षी हे घर बांधल गेल होत त्या वर्षी फक्त दोनच दिवसात मी रडून गावी परतलो होतो,आणि परतायच कारण काय होत सांगू ?- ‘गावातल्या नवीन घराची आठवण’ !  🙂  आताही आम्ही सगळे एकत्र आलो आणि कधी ही माझ्या घराच्या आठवणीची आठवण निघाली कि चांगलीच खसखस पिकते.तर तेव्हा नक्की माझ भावविश्व काय होत ते अचूकपणे  सांगता येत नाही पण असा मी अगदी लहानपणापासून  घराशी वेगळ्याच धाग्याने जोडला गेलो आहे.

कसही का असेना पण आपल्या घरात आपल्याला जेवढी सुरक्षितता वाटते तेवढी कुठेच वाटत नाही.मी कुठेही बाहेर गेल्यावर परततांना कितीही उशीर झाला ,रात्रीच्या प्रवासाची रिस्क घ्यावी लागली ,झोप कमी घ्यावी लागली तरी बहुतांशी  कसपण घरी येऊनच अंग टाकतो.सकाळी डोळे उघडल्यावर आपल्या घरात असल्याचा ‘फील’ वेगळाच असतो.कोणाला पापी पोटासाठी नोकरी करतांना दर काही वर्षांनी घर बदलाव लागते.एका घराशी नात जोडायच आणि काही वर्षातच त्याचा निरोप घ्यायचा.  अश्या लोकांबद्दल मला खरच सहानुभूती वाटते.सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस साधारणत: अवघ्या आयुष्याची पुंजी ह्या घरासाठीच रिकामी करत असतो.तस पाहायला गेल तर आपल्या सगळ्यांचाच घराशी एक वेगळच नात निर्माण झालेलं असत.ते घर आपल्या सु:ख दुखाच ,अनेक छोट्यामोठ्या घटनांच मूक साक्षीदार असते.कोणी ह्याच घरात मरणाच्या दारातून परत आलेल असते,कोणाला नोकरीचा कौल ह्याच घरात आलेला असतो,कोणाच लग्न ह्याच घरात ठरलेलं असत,त्याच्याबरोबर/तिच्याबरोबर गप्पा मारत कधी अख्खी रात्र जागवलेली असते ती ह्याच घरात,चिंटूचा जन्म झाला तो ह्याच घरात,कोणाच्या पुर्वजांच्या अनेक आठवणी विखुरलेल्या असतात त्या ह्याच घरात…अश्या वेगवेगळया बंधानी लोक ह्या घराशी जुडलेले असतात .

नेटवरून साभार ....

असाच एकदा मी आमच्या घरी गेलो.तिथे पोहोचल्यावर मी फाटकरावांना  हळूच धक्का दिला कारण बऱ्याचदा त्यांना  प्रेमाची भाषा कळत नाही.पण असा थोडासा हिसका दाखवला कि रावांच डोक थोड ठिकाणावर येत.ते रागाने गुरगुरत कुरकुर करत उघडले गेले ,पण उघडता उघडता ओळख पटल्याने एक डोळा मिचकावून त्याने माझे लगेच स्वागतही केले .मी बाजूला नजर टाकली कुंपणही माझ्याकडे बघून एक मंद स्मिहास्य देत होत, मी त्या स्मितहास्याचा स्वीकार करून पुढे गेलो.अंगणात चालता चालता एका ठिकाणी थोड ओल होत तिथे माझा पाय सरकत होता पण मी थोडक्यात सावरलं आणि म्हटलं बराच ‘स्लीपरी’ झालाय हा भाग.त्यावर अंगण लगेचच ओरडल जरा डोळे उघडे ठेऊन नीट चालता येत नाही तूला   आणि मला बोलतोय ,हे पाणी पण सकाळी तूच इथे टाकलास ना ? वा रे ! तुम्हाला नाचता येत नाही आणि आम्ही वाकडे . सहीये!” मी कानावर हात ठेवतच  झटपट  पायऱ्या ओलांडून दरवाजेबुवांकडे कुच केल.दरवाजेबुवा हाताची घडी घालून मस्त उभे होते.ते रामसेंच्या चित्रपटात ह्यांचे कोण ते चुलत भाऊ आहेत ना ते खूप मोठ्या आवजात कुरकुरत असतात पण आमचे हे बुवा मात्र अगदी शांत कधी उघडले कधी बंद झाले कळतही नाही.पण ते रामसेवाले त्याचे चुलत भाऊ आपोआप उघडतात, ह्यांना मात्र आमचा हाताचा प्रेमळ स्पर्श हवा असतो.दरवाजेबुवांना गोंजारत मी घरात प्रवेश केला.आत दोन खुर्च्या मी त्यांच्या मांडीवर बसाव म्हणून आपापसात भांडत होत्या मी त्यांना ठेंगा दाखवत मऊ गादीवाल्या सोफाभाऊच्या कुशीत हळूच विसावलो.

तिथे बसतो न बसतो तोच चांगलाच गलबलाट ऐकू यायला लागला.सगळ्या भिंती ताई आपापसात गप्पा मारत होत्या.माझ्या आगमनामुळे कदाचित त्यांच्या गप्पात खंड पडला होता पण आता त्यांच्या गप्पा पूर्ववत झाल्या होत्या.एक भिंत म्हणत होती, “खूप बोअर झालय,अग ए खिडके केव्हापासून बाहेर काय  बघत बसलीयेस आम्हाला पण सांग ना काय  बघतेस ते.” खिडकीने काहीच उत्तर दिल नाही ती आपल्याच तंद्रीत होती.अस तासंतास  बाहेर बघायचं हाच तिचा छंद होता.ती कधीतरीच ह्यांच्या संभाषणात सहभागी व्हायची. मग मधली भिंत म्हणाली,  “अग बाहेर ना एक फुल मस्त फुलल आह. केव्हापासून एक भुंगा येऊन त्या फुलाच्या कानात गाणी म्हणतोय आणि त्यावर ते फुल खुश होऊन हसतेय आणि त्या भुंग्याला काहीतरी भेट देतेय.मग भुंगेबुवा त्याचा निरोप घेतात पण न राहावल्याने त्या फुलाकडे परत परत येत आहेत.मध्येच एखाद रंगीबेरंगी फुलपाखरुही त्या फुलाबरोबर खेळायला येतेय.सुंदरच चालू आहे ग सगळ आणि ही बया त्यांच्याच विश्वात रमली आहे ती कसलं तुला उत्तर देतेय.” ह्यावर ती बाहेरची भिंत बोलली ” बघ ना मी माझ्या हृदयात हिला जागा दिली आहे आणि ही अशी मला काही बाहेरील गमती सांगतच नाही .तुझ बर आहे ग तुला बाहेरच सगळ  दिसतेही आणि तुझ्या पाठीला मला सहन करावा लागणारे  उन्हाचे चटके ,वाऱ्याचा -पाउसाचा मारही बसत नाही.माझ मेलीच नशीबच फुटक.”

ह्यावर वरचे छप्परभाऊ  म्हणाले तुला तर काही वेळ ते उन्हाचे चटके वैगेरे सहन करावे लागतात मला तर संबध दिवस ते सगळ सहन कराव लागत.आणि तुम्ही स्वत:च्या पायावर उभ्या आहात मला हे अस तुमच्या कुबड्या घेऊन…..” छप्परभाऊंच बोलण पूर्ण व्हायच्या आधीच समोरचे भिंत कडाडली, “एs , जा ग … तुला माझ्याकडे पाठ करून ठेवलेला टीवी बघतांना कसली मजा येते ग.तेव्हा खिदळताय काय ते खोट दु:ख पाहून रडताय काय….ह्या माणसांना वाटत असेल तुझ्या चेहऱ्यावर अजून जो ओलावा आहे तो  पाऊसाच्या वैगेरे पाण्यामुळे असेल पण मला माहितेय काल ती सासुसुनेची कोणती मालिका चालू होती, ती बघून मुसमुसून रडत असतांना तो ओलावा आलाय ते.” तेवढ्यात समोरची दुसरी भिंत किंचाळली “जा ग तुम्ही सगळ्या माझे काय हाल होतात तुम्हाला काय सांगू , ह्या घरात कोणाचा वाढदिवस असो किंवा गणपती बाप्पांसारखा उत्सव असो;  हे लोक माझ्या अंगावर त्या चिकट गमने किंवा सेलोटेपने काय काय चिकटवत असतात.वर ती कसली लायटिंग सोडतात तिचा पण शॉक लागतो माहितीये मला कितीतरी वेळा ,अजून काही लावायला हे लोक खिळे काय ठोकतात माझ्या अंगावर ,मी तेव्हा  आतून खूप हादरते ,पण करणार काय. वर ते सगळ डेकोरेशन काढतांना कसलं ओरबाडून काढतात.हे माझ्या उजव्या हाताची तर चामडे सोलली होती ह्यावर्षीच गणपतीच डेकोरेशन  काढतांना.हे बघा, खरचडल्याच निशाण कस दिसते आहे ते.तुम्ही आपल तेव्हा बोलता ”  कसली नटलीये बघा” ,पण माझ मलाच माहिती ग बाई! ”

एवढ्यात आतल्या बेडरूमची भिंत मधून म्हणाली , ” काय रडत बसल्यात तुम्ही नुसत्या…त्या तिथ शहरात बघा आपल्या सारख्या भिंतीना  ही माणस दहीहंडीला कशी एकावर एक थर करून उभी असतात,तस एकमेकींच्या खांद्यावर  एकमेकांच ओझ घेऊन उभ राहायला लागत …बिल्डिंग का काय अस म्हणतात त्याला … ” बाहेरची एक भिंत म्हणाली ” अग बाई !खरच का..आणि तुला कोणी ग सांगितलं हे ?.” आतून परत आवाज आला ” अग तिकडे माझी  मामेबहिण आहे ना पंधराव्या थरावर ,तीनेच मला वारयाभाऊकडून त्यादिवशी ‘मेसेज’ पाठवला होता. बर ते जाऊ दे मी आता तुम्हाला कि नाई एक गंमत सांगते. आता लवकरच दिवाळी येत आहे आणि मी कालच त्या माणसांच बोलण ऐकल ते कि नाई आपल्या सगळ्यांना नव्या रंगाचे कपडे घालणार आहेत.आणि त्या छपर भाऊला सांगा त्याला ना ते काहीतरी ‘पीओपीचा’ ड्रेस आणणार आहेत म्हणून ..”

मग काय सगळ्या भिंतींचा एकच गलबलाट सुरु झाला.त्याक्षणी मला वाटलं कोण म्हणत भिंतीना कान असतात ? भिंतीना फक्त एकच अवयव असतो- तोंड! असो त्यांचा किलबिलाट काही लवकर बंद होणार नव्हता, तेव्हा मी घराच्या मागे गेलो.त्यांच्या किलबिलाटात एका भिंतीच बोलण मात्र मला आवडलं ती म्हणत होती, ” आपल्या सर्वांमुळे हे घर उभ असल तरी  खऱ्या अर्थानं ते जिवंत असते त्या ह्या घरात राहणाऱ्या माणसांच्याच अस्तित्वानं,आणि आता दिवाळीला तर हे सगळे  इथे एकत्र येणार… सगळ कस भरभरून जाणार..एकदम धमाल.. दिवस कसे सरतील ते कळणारही नाही …ही दिवाळी वर्षातून दोनदा का ग येत नाही ? ”

घराच्या  मागे गेल्या गेल्या तिथली पायरी बोलली ” ये बैस माझ्या मांडीवर ,मी तुझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे.आजवर कितीतरी कातरवेळा तू माझ्यासोबत घालवल्या आहेस.तुला जरा दु:ख झाल ,जरा काही तुझ्या मनाला लागल कि तू इथे यायचास.हुंदके देत माझ्याशी ते ‘शेअर’ करायचास.तू दु:खी झाल्यावरच माझ्याकडे येत असल्याने तुझी नेहमीच आठवण येत असूनही तुला माझ्याकडे यायला लागू नये असच मी देवाला म्हणायचे.बर तुला आठवते तू सर्वात पहिला माझ्याजवळ कधी आला होतास ते ..” मला बरेचसे क्षण आठवून गहिवरल्यासारख  झाल होत.त्या पायरीची पहिली भेटही आठवली, मी तिला त्याबद्दल सांगणार इतक्यात ….. मोबाईलचा अलार्म जोरजोरात वाजायला लागला.

[हा लेख याआधी ‘मोगरा फुलला ई-दिवाळी अंक-२०११’ इथे प्रकाशित झालेला आहे.]